पुणेरी टाइम्स टीम…पुणे जिल्ह्यातील दौंड पंचायत समितीच्या (मनरेगा) रोजगार हमी कक्षात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसभरात शेकडो शेतकरी व मजूर कामगार लाभार्थी मस्टर काढण्यासाठी कार्यालयात चकरा मारत आहेत, मात्र त्यांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, अनेक शेतकरी व कामगारांचे मस्टर काढले गेले असले तरी ते ऑनलाईन प्रणालीत नोंदवले जात नसल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही. परिणामी, काम करूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याशिवाय, वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींसाठीची कुशल बिले तांत्रिक कारणे पुढे करून जाणीवपूर्वक अडवून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे मनरेगा योजनेचा मूळ उद्देशच हरवला असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष बाबा जगदाळे यांच्या तालुक्यातच घडत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची होत असलेली ही पिळवणूक थांबवण्यासाठी अध्यक्ष जगदाळे कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनरेगा योजनेत पारदर्शकता आणि वेळेवर मोबदला देणे अपेक्षित असताना, दौंड तालुक्यातील वास्तव मात्र उलट दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की शेतकऱ्यांची हीच अवस्था कायम राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.


