दौंड (प्रतिनिधी): MIT World Peace University, कोथरूड येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेच्या द्वितीय वर्षातील ६६ विद्यार्थ्यांनी दौंड तालुक्यातील वासुंदे गावात ‘रुरल इमर्शन प्रोग्राम’ अंतर्गत तीन दिवसीय उपक्रम राबविला. ग्रामीण जीवनशैली, शेती, स्वच्छता तसेच गावातील सामाजिक परिस्थिती यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान विद्यार्थ्यांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले. गावातील शाळा, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले. तसेच शेतामध्ये श्रमदान करून ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
याशिवाय विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाद्वारे गावकऱ्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे अभियांत्रिकी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत.
या उपक्रमाची संकल्पना Rahul V. Karad यांनी मांडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी जोडून समाजाभिमुख शिक्षण देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळा व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पारुल जाधव, डॉ. राजकुमार कोमटी, डॉ. दीपा नाथ आणि प्रो. वनिता टंक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्याची आणि समाजाशी नाते दृढ करण्याची महत्त्वाची संधी ठरत आहे.



