पुणेरी टाइम्स टीम… दौंड महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दि. १७ मार्च रोजी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मतदारसंघातील सिंचन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि खराब झालेल्या चिबड जमिनींच्या सुधारणेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दौंड तालुक्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान होणाऱ्या २८ कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम ४ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून हे काम वेळेत पूर्ण करावे, बोगदा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमीन मोकळी होणार आहे. ही मोकळी झालेली जागा पुणे शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘मेट्रो’ किंवा ‘रस्त्या’साठी वापरण्याचे नियोजन शासनाने करावे. यावर शासनाने अशा प्रकारच्या वापरासाठी स्वतंत्र धोरण आखण्याचे मान्य केले आहे.
मुळशी धरणाचे पाणी भीमा खोऱ्यात वळवण्याबाबत आमदार कुल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मार्च २०२४ मध्ये याबाबत बैठक झाली असून टाटा पॉवर कंपनीसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. याबाबत पुढील २ ते ३ महिन्यात प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू होईल, असा विश्वास मंत्री महोदयांनी यावेळी दिला.
दौंड तालुक्यातील १२ ते १४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेस’मध्ये करण्याबाबत आमदार कुल यांनी मागणी केली. यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढेल. तसेच उजनी बॅकवॉटरमध्ये मोठे बॅरेज उभारल्यास दौंड, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील गावांमधील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेल्या (चिबड) जमिनींच्या सुधारणेसाठी आमदार कुल गेल्या ५-६ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने ‘दौंड’ तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) १०० टक्के शासकीय खर्चाने जमिनी सुधारण्याची योजना राबवण्यास मान्यता मिळण्याची मागणी त्यांनी केली असून, त्यास . यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सर्व प्रश्नांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले असून, लवकर सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. दौंडच्या विकासाला आणि विशेषतः शेतीला मोठी गती मिळणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी नमूद केले.


