पुणेरी टाइम्स टीम… पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर कुल आणि थोरात या दोन राजकीय बलाढ्य नेत्यांच्या प्रतिष्ठेचा सामना ठरू लागला आहे. दोन्ही गटांनी कंबर कसली असून, संपूर्ण तालुका सध्या राजकीय रणांगणात बदलल्याचे चित्र आहे.
दौंडच्या राजकारणात नेहमीच आमने-सामने उभे ठाकणारे कुल विरुद्ध थोरात यंदा पुन्हा एकदा थेट भिडले आहेत. प्रत्येक गट, गण, प्रत्येक गाव आणि प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रित करत दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, प्रचाराला आक्रमक वळण मिळाले आहे.
मात्र या थेट लढतीत अपक्ष उमेदवार आणि शरद पवार गटातील बंडखोरांनी राजकीय गणित पूर्णपणे ढवळून काढले आहे. अनेक ठिकाणी हेच उमेदवार “गेमचेंजर” ठरण्याची शक्यता असून, यामुळे कुल आणि थोरात दोन्ही गटांची झोप उडाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही गणांमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोर मैदानात उतरल्याने मतांची विभागणी अटळ मानली जात आहे. त्यामुळे हा फटका कोणाला बसणार? कुल गटाला की थोरात गटाला? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
गावागावात बैठका, गुप्त रणनीती, शक्तिप्रदर्शन आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण तापले आहे. ही निवडणूक जिंकणे म्हणजे केवळ सत्ता नाही, तर दौंडच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध करण्याची संधी असल्याने दोन्ही नेत्यांनी जास्त जागा निवडून आणण्यासाठीचा निर्धार केला आहे. एकूणच, दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक ही “कुल की थोरात?” या एका प्रश्नाभोवती फिरत असून, अपक्ष आणि बंडखोरांचा स्फोटक प्रभाव या लढतीचा निकाल उलथवून लावणार की काय, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निकालाच्या दिवशीच ठरणार – दौंडचा किल्ला कुणाचा!



